शेतकऱ्यांना घोषणा नको अंमलबाजवणी करा – खा. रजनीताई पाटील

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज दि.८ (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील राज्य सरकार व केंद्र सरकार केवळ आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने कसे आहोत हे दाखवण्याचा देखावा हे सरकार करत असून शेतकऱ्यांना फक्त घोषणा दिल्या जात आहेत असं परखड मत काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या खा. रजनीताई पाटील यांनी राज्यसभेत व्यक्त केले.
आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय विदारक चित्र पहायला मिळत आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल ६ ते ७ हजार रुपये भाव देऊ म्हणून निवडणुकीत मत घेणारे हे सरकार आज ३ हजार ८०० ते ४ हजाराने सोयाबीन विकत जात असताना सरकार काय करत आहे हमीभाव कशाला बांधला ? असे सवाल त्यांनी केले तसेच १ रुपया मध्ये पीक विमा आणला ही चांगली गोष्ट मात्र तो विमाच दिला जात नाही उलट महाराष्ट्रात ५०० कोटींचा घोटाळा या विम्यात झालाय हे भाजपचे एक आमदारच सांगत आहेत मग ही योजना सरकार मधल्या लोकांसाठी आणली गेली का ? असाही प्रश्न पडतो . महा DBT सारख्या पोर्टलवर केवळ योजनांच्या नोंदणीचा फार्स केला जातोय याचा प्रत्यक्षात लाभ किती आणि कधी मिळणार असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत अनुत्तरित असल्याचे खा.रजनीताई पाटील म्हणाल्या. तसेच सरकार कृषी क्षेत्रात आर्टिफीशीयल इंटेलिजन्स (ए आय) चा वापर करणार अशा घोषणा करणे म्हणजे एक फॅशनच झाली असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली. शेतकऱ्यांच्या अशा विविध प्रश्नांवर खा.रजनी पाटील यांनी आवाज वठवत सरकारला चांगलेच धारेवर धरले व शेतकऱ्यांच्या मुख्य प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली त्यामुळे आता सरकार याची दखल घेऊन यामध्ये काय सुधारणा करणार हे महत्वाचे आहे.