आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

तब्बल 50 वर्षाने इयत्ता 10 वि च्या वर्गमित्रांचा प्रथम स्नेह मेळावा संपन्न

शैक्षणिक आयुष्यातील आठवणींना उजाळा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

 

कळंब /प्रतिनिधी

 

जि.प.प्रशाला शिराढोण ता.कळंब जि.धाराशिव या शाळेत सन.१९७३-७४आणि १९७४-७५मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिलेल्या विद्यार्थी बंधू-भगिनींचा स्नेह मेळावा आज दि.०८/६/२०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.याची संकल्पना सतीश कोंडेकर यांच्या मनात आली.ती त्यांनी त्यांचे वर्ग -बंधू फुलचंद माळी (नथाडे) यांच्या समोर मांडली आणि फुलचंद माळी सतीश कोंडेकर यांना घेऊन प्रत्यक्ष कामाला लागले.

दि.०२ मे २०२५ पूर्वी फुलचंद माळी यांनी सतीश कोंडेकर यांना आपल्या कार मध्ये घेऊन छत्रपती संभाजीनगर येथून प्रस्थान केले आणि केज येथे वास्तव्यास असलेले त्यांचे मित्र खडबडे जंबू वैजनाथ यांच्याशी संपर्क साधला आणि केज येथून त्यांना आपल्या गाडीत घेऊन तडक आपले मूळगाव शिराढोण गाठले.

परदेशी राजेश लक्ष्मीनारायण यांच्या निवासस्थानी आपल्या आठवणीत असणारे काही मित्र यांना बोलावून घेऊन बैठक घेतली आणि त्यांच्या समोर स्नेह मेळाव्याची संकल्पना मांडली सर्वांनी उत्साहाने प्रथम स्नेह मेळावा साजरा करण्यासाठी संमती दर्शवली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या बैठकीसाठी ताडगांव ता.कळंब येथील त्यांचे मित्र अर्जुन जाधवर आणि भागवत जाधवर यांना बोलावून घेतले.दोघांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला परंतु अर्जुन जाधवर यांनी सांगितले की या सर्वांचे नियोजन तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी आमचा बी.एड.चा वर्गबंधूं शेख दस्तगीर अब्दुल याला यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे.त्याची जबाबदारी खडबडे जंबू वैजनाथ यांनी स्वीकारली.झाले कोंडेकर यांनी वाट्स ऍप ग्रुप तयार करून शेख दस्तगीर अब्दुल यांना प्राथमिक स्वरूपात ग्रुप चे सदस्यत्व बहाल केले.

शिराढोण घ्या जि.प.प्रशालेमध्ये शिक्षण घेतलेल्या वर्गबंधूंना शेख दस्तगीर यांनी यापूर्वीच हायस्कूल फ्रेंड्स नावाच्या ग्रुप मध्ये एकत्र करून सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना अद्याप पूर्णत्व आलेलं नव्हतं तशातच त्यांना

१९७४ जि.प.प्रशाला विद्यार्थी ग्रुप

—————————————

मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आणि त्यांनी ठरवले की आपणही आपल्या मित्रांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरलेच पाहिजे असा निर्धार केला आणि धडाडीने कामाला लागले.

प्रथमतः शेख दस्तगीर यांनी ग्रुप मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व बंधूं-भगिनींची इंग्रजी वर्णाक्षरांनुसार रचना करून प्रत्येकाची नोंद केली.

दि.२५ हे रोजी शिराढोण येथे सदरील स्नेह मेळावा दि.०८/६/२०२५ रोजी घेण्यासाठी दुसरी बैठक झाली.यामध्ये सतीश कोंडेकर, फुलचंद माळी (नथाडे), जंबू खडबडे आणि जि.प.प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक सुनील अहिरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.अमोल चंदेल आदि मान्यवर उपस्थित होते सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

३१/५/२५रोजी फुलचंद माळी यांनी शेख दस्तगीर यांच्या संमतीने तिसऱ्या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर येथून प्रस्थान केले आणि जि.प.प्रशाला शिराढोण येथे त्याला मूर्त रूप दिले.या बैठकीसाठी फुलचंद माळी (नथाडे), शेख दस्तगीर अब्दुल,खडबडे जंबू वैजनाथ,काळे चंद्रकांत राजराम,जाधवर अर्जुन मनोहर, परदेशी राजेश लक्ष्मीनारायण, प्रशालेचे मुख्याध्यापक मा.सुनील अहिरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल चंदिले यांनी संभाव्य ०८ जून रोजी होणाऱ्या प्रथम स्नेह मेळाव्याला अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काय-काय करावे लागेल याची फक्त सविस्तर चर्चाच केली नाही तर प्रत्यक्ष कामाची विभागणी केली आणि प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर क्रियाशील राहून प्रथम स्नेह मेळावा यशस्वी करण्याचे अभिवचन दिले.

श्रीहरी माळी यांनी भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वीकारली याला आर्थिक मदत संपूर्णपणे फुलचंद माळी ( नथाडे) यांनी केली. स्नेह मेळाव्याला १९७३-७४आणि १९७४-७५ कार्यरत असणाऱ्या आणि उपलब्ध झालेल्या गुरुजींच्या यथोचित स्वागत सन्मान आणि आदरातिथ्याची जबाबदारी खडबडे जंबू वैजनाथ यांनी वैयक्तिक रित्या स्वीकारली .तर प्रथम स्नेह मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या वर्ग भगिनींचा योग्य तो सन्मान त्यांच्या यजमांनांसह मी स्वतः वैयक्तिक स्वरूपात करेन असे अभिवचन सतीश कोंडेकर यांनी दिलं.

दि.३० मे च्या बैठकीसाठी आल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक साहेबांच्या समवेत शाळेच्या भौतिक सुविधा मध्ये असलेल्या उणिवांवर विचार विनिमय करून असा निर्णय घेण्यात आला की विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या शालेय स्पर्धेत सहभागी होऊन मिळवलेल्या बक्षीसांना Shields,Trophies ठेवण्यासाठी योग्य अशा ( शो केस) कपाटाची अतिशय आवश्यकता आहे.तेव्हा ही भेट वस्तू आम्ही शाळेत आणू असे अभिवचन शेख दस्तगीर सर यांनी दिलं.यामध्ये स्वतः शेख दस्तगीर सर,खबबडे रोहीदास खंडेराव, नरवडे विश्वनाथ, जाधवर अर्जुन मनोहर,जाधवर भागवत शिवदास,गाडे संदिपान देविदास, साबळे प्रभाकर व्यंकटराव आदिंचा सहभाग असावा असे ठरले.

स्वागत सन्मान करण्यासाठी पुष्पहार, पुष्पगुच्छ,फूले विकत आणण्याची जबाबदारी स्वीकारली ती परदेशी राजेश लक्ष्मीनारायण यांनी.

अशा प्रकारे कामांचे संपूर्ण नियोजन करूनच बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय सदस्यांनी आपापली जागा सोडली.

त्यानुसार आज दि.०८/६/२०२५ रोजी जि.प.प्रशाला शिराढोण येथे प्रथम स्नेह मेळावा घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . आनंदराव जाधवर गुरुजी यांचे नांव श्री.माणिक म्हेत्रे यांनी सूचित केले तर तर त्याला अनुमोदन साबळे प्रभाकर व्यंकटराव यांनी दिले. फुलचंद माळी ( नथाडे) यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर दिवंगत ज्ञात अज्ञात वर्ग बंधू – भगिनी आणि गुरुवर्य यांना एक मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . विशेषतः या शाळेसाठी संपूर्ण जमीन ज्यांनी दान केली ते कै.सूरजमलजी रामकिसनजी मुंदडा यांचे पणतू प्रथमेश उर्फ राधेय रमण मुंदडा यांना निमंत्रण दिले त्यांना शाळेत बोलावून त्यांचा यथोचित सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल चंदिले यांच्या हस्ते केला.खडबडे जंबू वैजनाथ यांनी त्यांना शिकविलेल्या गुरुजींचा पूर्ण पेहराव्यानिशी सपत्नीक सत्कार केला.याप्रसंगी मदनलाल खटोड, श्रीकृष्ण जाजू, शैलजा ताई पाटील, रत्नमाला माकोडे, संगवे संजीवनी, प्रदिप पाटील,संपत पाटील, विश्वास पाटील, रत्नमाला जेगांवकर, प्रेमचंद सरवदे, सुरेश पाटील, वामन साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.शाळेचे कार्यरत मुख्याध्यापक सुनील अहिरे उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी शाळेचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी श्रीमती महामुनी मॅडम ज्या या प्रशालेत कार्यरत असून कै.नागनाथ पोतदार यांच्या सूनबाई आहेत त्यांच्यावर सोपवली होती ती त्यांनी पार पाडली आणि महिला स्वभावाच्या पैलूंवर मिस्किलपणे प्रकाश टाकून उपस्थितांची मने जिंकली

कोंडेकर सतीश व्यंकटेश यांनी उपस्थित बंधू -भगिनींचा त्यांच्या जोडीदारासोबत यथोचित सत्कार केला. या प्रथम स्नेह मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शेख दस्तगीर सर यांनी एकूण ६५ जणांशी संपर्क केला त्यापैकी ५२ उपस्थित राहीले कार्यक्रम माहीत झाल्यानंतर ऐनवेळी ०६ जण आवर्जून उपस्थित झाले.काही बंधू -भगिनींचा समावेश सहकुटुंब होता तर काही आपल्या आप्तेष्ट तसेच वाहन चालकासह उपस्थित होते अशी एकूण या प्रथम स्नेह मेळाव्याची उपस्थिती १६५ होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख दस्तगीर अब्दुल यांनी केले आणि अध्यक्षांच्या समारोपानंतर आभार प्रदर्शन करुन सामुदायिक राष्ट्रगीत म्हणण्याची ऑर्डर दिली.सर्वांनी सामुदायिक राष्ट्रगीत गायन केले.त्यानंतर सर्व ग्रुप फोटो मध्ये समाविष्ट झाले.समूह भोजन करुनच सर्वांनी एकमेकांचा जड अंतःकरणाने निरोप घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.