देश विदेशमहाराष्ट्रसांस्कृतिक

नेपाळ – भारत बहुभाषिक साहित्य संमेलनात कविवर्य दिनकर जोशी यांच्या “सोनियाचा पिंपळ” ने मिळवला वन्स मोअर

_जागतिक मातृभाषा दिनानिमित्त आयोजित बहुभाषिक साहित्य संमेलनात अंबानगरीचा गौरव_

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई (वार्ताहर)
अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित नेपाळ – भारत बहुभाषिक कवि संमेलनात निमंत्रित कवी दिनकर जोशी यांच्या “सोनियाचा पिंपळ” या कवितेने उपस्थित रसिक – श्रोते यांना मंत्रमुग्ध करीत वन्स मोअर मिळविला, या बहुभाषिक साहित्य संमेलनात निमंत्रित कवी जोशी यांच्या सक्रिय सहभागाने एकप्रकारे अंबानगरीचा गौरवच झाला.

नुकतेच बुधवार, २१ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय दूतावास नेपाळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा (जि.सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू येथे नेपाळ – भारत बहुभाषिक साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. त्यानिमित्ताने मराठी, नेपाळी, मैथिली, अवधी, संस्कृत, हिंदी, भोजपुरी, ऊर्दू व इंग्रजी अशा १२ भाषेतील तब्बल ख्यातनाम ३० कवींनी आपल्या बहारदार आणि लोकप्रिय कविता सादर केल्या. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे संमेलन काठमांडू येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. भारतीय दूतावासातील सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.आसावरी बापट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी
प्रमुख अतिथी म्हणून भूपाल राई (कुलपती, नेपाळ प्रज्ञा प्रतिष्ठान), बिमल कृष्ण श्रेष्ठ (उपकुलपती, नेपाळ प्रज्ञा प्रतिष्ठान) व ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.गंगाप्रसाद अकेला हे मान्यवर लाभले होते. अध्यक्षस्थान त्रिभुवन विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख डाॅ.संजीता वर्मा यांनी भूषविले. तर नेपाळचे राजदूत श्रीवास्तव या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. यावेळी काशिनाथ न्यौपाने (हिंदी विभाग त्रिभुवन विश्वविद्यालय), गिरीशचंद्र लाल (नेपाळ उच्च न्यायालयाचे पूर्व न्यायाधीश), प्रोफेसर माधवप्रसाद पोखरेल (नेपाळ येथिल प्रतिष्ठित भाषातज्ज्ञ) उपस्थित होते. सहअध्यक्षा म्हणून २४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.ज्योती कदम (नांदेड) या उपस्थित होत्या. रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉ.स्मिता पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमाचे दीप प्रज्ज्वलन डॉ.उर्मिला चाकूरकर, डॉ.स्वाती शिंदे – पवार, अनिल पवार, प्रा.डॉ.प्रीती शिंदे – पाटील, आशा डांगे, डॉ.शुभा लोंढे यांनी केले. विशेष अतिथी म्हणून मनोज पाठक, प्रा.डॉ.विलास पाटील, दिनकर जोशी (अंबाजोगाई), चंद्रशेखर पाटील हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी पाठविलेला शुभसंदेश
सर्व रसिकांना चित्रफितीद्वारे दाखविण्यात आला. भाषेचे राष्ट्राच्या प्रगतीत खूप मोठे योगदान असते. भारत व नेपाळ यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक गहिरे करण्यासाठी सर्व साहित्यिक प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा डॉ.मुळे यांनी व्यक्त केली. अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या डाॅ.स्वाती शिंदे-पवार, अनिल पवार, प्रा.डॉ. प्रीती शिंदे – पाटील यांनी अक्षरयात्री प्रतिष्ठानचे हे रौप्य महोत्सवी संमेलन काठमांडू येथे साजरे करून एक नवे पाऊल टाकले आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्रातून दहा कवी व कवयित्री यांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक भाषेतील कवी आणि कवयित्रींनी आपल्या दर्जेदार, लोकप्रिय कविता यावेळी सादर केल्या. वेगवेगळ्या बारा भाषेतील साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात सहभाग नोंदविल्याने इतर भाषेतील विचारांची आधार प्रदान यावेळी चांगल्या प्रकारे झाली.
जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून संपन्न झालेल्या या साहित्य संमेलनाप्रमाणे मराठी भाषेचे साहित्यिक कार्यक्रम जगभर करण्याची भूमिका यावेळी डॉ.स्वाती शिंदे – पवार यांनी यावेळी बोलून दाखविली. त्रिभुवन विद्यापीठ व संस्कृत विद्यापीठातील कुलपतींनी यावेळी मराठी साहित्यिकांना विद्यापीठांमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. भारतीय भाषेतील कवितांचा अनुवाद इतर भाषेमध्ये करणारी मंडळी या संमेलनातून पुढे आली हे विशेष होय. मराठी भाषेतील उत्कृष्ट कवितांना उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. नेपाळचे माजी राजदूत ठाकूर सर यांनी भारतीय साहित्यिकांना चहापानासाठी निमंत्रित केले.
या संपूर्ण संमेलनाचे अतिशय उत्तम व देखणे नियोजन राजदूतावास नेपाळ आणि अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी डॉ.ज्ञानेश्वर मुळे, माजी राजदूत व डॉ.आसावरी बापट यांनी विशेष परिश्रम घेतले. या एक दिवसीय साहित्य संमेलनानंतर भारतीय साहित्यिकांसाठी अक्षरयात्री प्रतिष्ठान व स्वराज हॉलिडेज विटाच्या संचालिका अमृता जाधव व रवी जाधव यांनी पर्यटन व्यवस्था अत्यंत उत्तम केली. साहित्यिकांच्या सत्कारांचे नियोजन अनुजा पाटील व संध्या धाट यांनी केले होते. या संमेलनामुळे भारत नेपाळ मैत्रीचा पूल बांधण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास दोन्ही देशातील साहित्यिकांनी यावेळेस व्यक्त केला. बहुभाषिक कविसंमेलनात प्रा.डॉ.विलास पाटील, परभणी यांनी (बहिणबाई), डॉ.उर्मिला चाकूरकर, पैठण यांनी (विठोबा), डॉ.ज्योती कदम, नांदेड यांनी (आदिम जाणीव), मनोज पाठक, बुलढाणा यांनी (ए और वो) ही हिंदी कविता सादर केली., प्रा.प्रीती शिंदे – पाटील, वारणानगर यांनी (माय मराठी) ही कविता म्हणून रसिकांची चांगलीच पसंती मिळवली. कविवर्य दिनकर जोशी, बीड यांनी (सोनियाचा पिंपळ) ही कविता सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद, पसंती आणि वन्स मोअर
मिळवला., डॉ.स्मिता पाटील, मोहोळ यांनी (तिचा ठाव), डॉ.शुभा लोंढे, पुणे यांनी (लगते है) ही हिंदी ऊर्दू बहारदार गझल सादर करून मोठी वाहवा मिळविली. आशा डांगे, औरंगाबाद यांनी (जत्रा), डॉ.स्वाती शिंदे – पवार यांनी (साहित्यिक आहे मी एल्गार आहे) ही कविता सादर केली. या संमेलनातील सर्वच कवी हे प्रतिथयश मान्यवर कवी असल्याने हे साहित्य संमेलन अधिक समृद्ध झाले. यावेळी अक्षरयात्री प्रतिष्ठानने विश्व संमेलनाच्या उचललेल्या पावलाचे उपस्थित रसिक – श्रोते यांच्याकडून मनापासून स्वागत व कौतुक करण्यात आले. यावेळी त्रिभुवन विश्वविद्यालय, वाल्मिकी विद्यापीठ, नेपाळ संस्कृत विश्व विद्यालय, अक्षरयात्री प्रतिष्ठान (भारत), स्वामी विवेकानंद संस्था नेपाळ, राजदूतावास नेपाळ यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. या साहित्य संमेलनास नेपाळ मधील सर्व मान्यवर लेखकांनी आपली मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. या बहुभाषिक आंतरराष्ट्रीय कवि संमेलनात साहित्य, संस्कृती व काव्य या विषयावर मौलिक असे चिंतन झाले.

================
================

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.