पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे योगाला जागतिक पातळीवर महत्व प्राप्त झाले
सदृढतेसाठी व्यायाम सातत्य महत्वाचे - प्रवक्ते राम कुलकर्णी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
योग अभ्यास ही परंपरा पुरातन काळापासून सुरू असून ऋषी-मुनींनी तर योग आधारे नवचैतन्य प्राप्त केले. सामाजिक कार्याला चालना देणारी व्यवस्था उभी राहिल्यानंतर आदर्श प्रस्थापित होतात. २०१५ पासून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योगाला जागतिक पातळीवर महत्व प्राप्त करून दिले. स्वत:च्या शरीर सदृढतेसाठी व्यायाम योग अत्यंत महत्वाचे असुन एक रूपाया खर्च न होता असाध्य रोग पळून जातात. केवळ त्यातलं सातत्य टिकवणं महत्वाचे, कुणी करा म्हणुन करण्यापेक्षा स्वत: अंतर्मुख होवून याकडे पाहिलं तर त्याची किंमत निश्चित कळेल असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.
शहरातील खोलेश्वर महाविद्यालयातील क्रिडा विभागाच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिबीर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर योगगुरू अंबादास भटांगरे, प्राचार्य डॉ.दिपक फुलारी, क्रीडा विभागप्रमुख श्री.चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना कुलकर्णी म्हणाले की, रोज व्यायाम करणं ही प्रत्येकाची गरज ज्यांनी ओळखली अशी माणसं सातत्य कधीच सोडत नाहीत. धावपळीच्या युगात आत्मचैतन्य वाढवून मन:शांतीसाठी योगाचे फायदे होतात. प्रत्येक माणूस निरोगी राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र कोणती ही गोष्ट स्वत: मनावर घेणे महत्वाचे वाटते. कुणी सुचवलं म्हणून करण्यापेक्षा किंवा २१ जुन योग दिनानिमित्त करण्यापेक्षा यातलं सातत्य प्रत्येकाच्या शरीर हितासाठी महत्वाचं वाटतं. ध्यानधारणा प्रत्येकाची गरज सध्याच्या काळात झाली आहे. वास्तविक पहाता योग ध्यानधारण या परंपरा पुरातन काळापासून चालत आल्या आहेत. ऋषी-महाऋषींनी यावर आधारित सदृढ जीवनावर यश मिळवले. अलीकडच्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तर योगाला जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्व प्राप्त करून दिले. प्रत्येकासाठी व्यायाम ही आज काळाची गरज बनली. पण, त्याची किंमत आपल्याला कळत नाही. सध्या विविध व्याधी, आजारांनी माणूस त्रस्त असतो. उदा.रक्तदाब वाढला, मधुमेह झाला, सांधेदुखी वाढली. मग आपण बसल्या जागी वैद्यकिय क्षेत्राची भरती करीत रहातो. मात्र या सर्व रोगांवर मात बिनपैशाच्या व्यायाम, योग, ध्यान साधनेने होत असेल तर आपले डोळे का उघडत नाहीत ? असा सवाल त्यांनी केला. यामध्ये सातत्य ठेवलं तर रक्तदाब, मधुमेहासारख्या व्याधी आपल्या जवळ आल्या तरी निघून जातात. मी स्वअनुभवातून सांगतो. दिनचर्या बदलणे ही काळाची गरज असून यावर जो यश मिळवतो. तोच खर्या अर्थाने शारीरिकदृष्ट्या सक्षम होवू शकतो. संसार जीवनात कठोर परिश्रम करा. पण, योग, व्यायाम कधी सोडू नका. ध्यानधारणा किमान १५ मिनिटं करून बघा. आत्मबलाची क्षमता वाढल्याशिवाय रहाणार नाही. पण, हे सारं स्वत: र्हदयातून केलं पाहिजे. पंतप्रधानांसारखी व्यक्ती जेव्हा असे उपक्रम हाती घेतो त्यात डोकावून पाहिल्यानंतर आपल्याला खर्या अर्थाने व्यायामाचे महत्व कळते. तरूण पिढीने उज्ज्वल भविष्यासाठी या उपक्रमाकडे वळावे आणि सातत्य टिकवावे असे आवाहन त्यांनी केले. शिक्षक, प्राध्यापक या मंडळींकडे समाजाला आदर्श देणारं व्यासपीठ म्हणून ओळखल्या जातं. त्यांनी खर्या अर्थाने जनजागृती करीत समाजाला योग अभ्यासाची प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष दिशा दिली. तर लोक अनुकरण निश्चित करणार असा दावा त्यांनी केला. यावेळी उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड, प्रा.बिभीषण फड, प्रा.डॉ.रविंद्र कुंबेफळकर, आनंद पाठक आदी मान्यवरांची उपस्थिती होती.