महाडिबीटी प्रणाली सुरू करून लाभधारकांची हेळसांड थांबवा ; जनगनना करताना दारिद्र्य रेषेत पात्र असणाऱ्या कुटूंबांचा समावेश करा
माजी आमदार पृथ्वीराज साठे यांची निवेदनाद्वारे मागणी

अंबाजोगाई (वार्ताहर)
महाडिबीटी प्रणाली सुरू करू लाभधारकांची हेळसांड थांबवा ; जनगनना करताना दारिद्र्य रेषेत पात्र असणाऱ्या कुटूंबांचा समावेश करा अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उपजिल्हाधिकारी यांना शुक्रवार, दिनांक २० जुन २०२५ रोजी दोन स्वतंत्र निवेदने देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाडिबीटी प्रणाली बंद असल्यामुळे श्रावणबाळ, संजय गांधी, निराधार योजना, विधवा महिलांना दिले जाणारे अनुदान व दिव्यांग यासाठी मिळणारे अनुदान हे महाडिबीटीमुळे मिळत नाही. कारण, गेल्या एक महिन्यापासून महाडिबीटी बंद आहे. त्यामुळे या सर्व लाभधारकांची मोठी हेळसांड होत आहे. त्यासाठी त्यांना बँकेचे व आपल्या कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. त्यामुळे तात्काळ महाडिबीटी सुरू करून उपेक्षितांना न्याय देण्यात यावा. ज्या लाभधारकाचे अनुदान सात ते आठ महिन्यांपूर्वी मंजुर झालेले आहे. अशा अनुदानास पात्र लोकांना फक्त एक महिन्याचे अनुदान मिळालेले आहे. उर्वरित सात ते आठ महिन्यांच्या संदर्भातील अनुदान तात्काळ देण्यात यावे तसेच केंद्र सरकारने जनगनना करण्याबाबतची अधिसूचना काढलेली आहे. त्या अनुषंगाने आमची मागणी आहे की, सन २००५-०६ रोजी दारिद्र्य रेषेच्या सर्व्हे करण्यात आला होता. त्या नंतर सन २०११ च्या जनगनने मध्ये जे कुटूंब दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना दारिद्र्य रेषेखालील कुटूंबासाठी ज्या सेवा सुविधा व योजनाचा लाभ देण्याबाबत सुचना होत्या परंतु केंद्र सरकारच्या रचनेप्रमाणे या वेळेस जनगनना होणार आहे. त्या वेळेस सर्व्हे करीत असतांना दारिद्र्य रेषेस पात्र असणाऱ्या कुटूंबाचा समावेश जनगनना मध्ये करावा. अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनांतून करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ.नरेंद्र काळे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पदवीधर संघटना.), अशोक मोदी, संजिवनी देशमुख, अंकुश ढोबळे, तानबा लांडगे, ऍड.शहाजहान खान पठाण, ऍड.प्रशांत पवार, हमीद चौधरी, सुधाकर जोगदंड, इम्रान यारखान,विशाल जहागीरदार, दिलीप भालेकर, ऍड.नरेश साबणे, ऍड.इस्माईल गवळी, ऍड.एस.के.पठाण, चंद्रकला देशमुख, आशा जोगदंड, धनराज सोनवणे, शेख अकबर अली,खतीब ताई,रामराव आडे,राजकुमार वाहूळे,वैजनाथ राठोड,गफार गवळी,आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.